

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग पाचवा- धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात
Campaign for Conversion Resumed


Conversion of Brahmins of Uttaravati
*************************
1) एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहात असताना मनुष्ये व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राम्हण राहात होते.
2) अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निर्ग्रंथ संन्याश्याच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते.
3) जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही.
4) अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या जीवाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले.
5) पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राम्हणांनी त्यास अशा स्वरुपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला.
6) त्यावर त्या वृक्ष-समंधाने सांगितले की, ज्या वेळी अनाथ पिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्या वेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असतांना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला, आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला.
7) दुस-या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर, "कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात?" असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, "मला कसलाही त्रास झाला नाही. परंतु जेतवनात भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो."
8) तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, "हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे." इत्यादि.
9). "तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही; उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मरायला टेकल्यावर माझी अशी अवस्था झाली. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे." आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले:
10) "यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रांत्रदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय."
11) "दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीरधर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने (बुद्धांच्या) धम्माचे पालन करावे आणि (ऋषींनी) सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमांतून आपली सुटका करुन घ्यावी."
12) हे शब्द ऐकल्यावर ब्राम्हणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगद्वंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले:
13) "मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग?"
14) "जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयाची इच्छा नसते, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही."
15) "पुण्य लाभावे म्हणून भुताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणा-या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही बरोबर नसते."
16) "जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते."


*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग सहावा- कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा
१. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा
*********************
No comments:
Post a Comment