पोस्ट नं 126, 127

📚 पोस्ट नं 126, 127 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग पाचवा- धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात
Campaign for Conversion Resumed
🌷1. खेडवळ ब्राम्हणांना धम्मदीक्षा 🌷
Conversion of Rustic Brahmins
*************************

*******************
***पोस्ट नः- *126***
*******************
1) गृध्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तेथे सुमारे सत्तर कुटुंबे होती, जी सर्व ब्राम्हणांची होती.

2) या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले.

3) त्यांचे तेजस्वी व आदरणीय व्यक्तीमत्त्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राम्हणांना विचारले, "तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहात आहात? आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता?"

4) यावर त्यांनी उत्तर दिले, "येथे आमच्या तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत. आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे."

5) त्यांच्या धार्मिक श्रध्देविषयी विचारता ते म्हणाले, "निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सुर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पुजा करतो व त्यांना होमहवन, बळीअर्पण (sacrifice) करतो."

6) "जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रम्हलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो."

7) भगवान बुद्धांनी उत्तर दिले, "हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे श्रमण बनणे आणि निर्वाणप्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे (complete selfcomposure) हाच मार्ग खरा होय." आणि ते पुढे म्हणाले:

8) "जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही खरा लाभ प्राप्त होत नाही."

9) "परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे, ही खरी सचोटी व प्रामाणिकपणा होय, ज्यामुळे तुमचे खरे हित साधले जाईल."

10) "जगात मृत्यू सर्वत्र आहे– त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही."

11) "जगात मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणिमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय."

12) हे शब्द ऐकल्याबरोबर त्या सत्तर ब्राम्हणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले; आणि ते खरे श्रमण दिसू लागले.

******************
***पोस्ट नः- *127***
******************
13) नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका-मुलांविषयीचे काही विचार सतावू लागले. परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत.

14) रस्त्याच्या बाजूला सुमारे दहा घरे होती. त्यांत त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एका घरात प्रवेश करताच, छत गळत असून पावसाचे पाणी आत येत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही, असे त्यांना दिसून आले.

15) तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, "ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्या वेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते, त्यावेळी वासना (कामवासना) आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात."

16) "परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते, त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही; त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत."

17) हे ऐकून त्या सत्तर ब्राम्हणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याची जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते. तरीसुद्धा ते पुढे जाऊ लागले.

18) पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले:

19) "जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो, आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो."

20) "परंतू ज्याप्रमाणे सुंगधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो, त्याप्रमाणे (सज्जनांची संगत धरणारा) शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणांत पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो."

21) या गाथा ऐकून, घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यावर त्या सत्तर ब्राम्हणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अर्हतपद प्राप्त करुन घेतले.

*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. उत्तरावतीच्या ब्राम्हणांना धम्मदीक्षा
*************************

No comments:

Post a Comment