

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home


Reception by the Sakyas
*************************
11) शाक्य अनुरुद्धाने असे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली; "लाडक्या अनुरुध्दा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ?"
12) पुन्हा एकदा अनुरुध्दाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनुरुध्दाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली.
13) त्या वेळी शाक्य राजा भद्दीय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनुरुध्दाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ती अनुरुध्दाला म्हणाली, "लाडक्या अनुरुध्दा, जर राजा शाक्य भद्दीय याने संसारत्याग केला तर तूही त्यांच्याबरोबर जा."
14) नंतर अनुरुध्द भद्दीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला; "प्रिय मित्रा, माझ्या संसारत्यागात तुझ्यामुळे अडथळा येत आहे."
15) "मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसारत्याग कर."
16) "प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करुया!"
17) "प्रिय मित्रा, संसारत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन. तू एकटाच संसारत्याग कर," भद्दीय म्हणाला.
18) "प्रिय मित्रा, जर तू संसारत्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की, "जर तुझ्या संसारत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करतो. मी देखील संसारत्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे." म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करु या!"
19) शाक्य राजा भद्दीय अनुरुध्दाला म्हणाला: "प्रिय मित्रा, सात वर्षे थांब, सात वर्षानंतर आपण बरोबरच संसारत्याग करु."
20) "प्रिय मित्रा, सात वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी सात वर्षे थांबू शकत नाही."
21) भद्दीयाने ती मुदत सहा वर्षांवर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली. मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एक महिन्यावर आणि मग एका पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनुरुध्द म्हणाला: "इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही."
22) मग राजा म्हणाला, "मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवीपर्यंत सात दिवस थांब."
23) "सात दिवस म्हणजे काही फार नाहीत. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे." अनुरुद्धाने त्याला उत्तर दिले.
24) याप्रमाणे शाक्य राजा भद्दीय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रिडोद्यानावर चतुरंगसेनेसह मिळून जात असत, तसे या वेळीही चतुरंग सेनेसह ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले.
25) काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, "मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उपजीविकेसाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो." आणि मग ते पुढे गेले.
26) ते पुढे चालू लागले आणि उपालीने घरी परत जाण्यासाठी त्यांचा निरोप घेतला.
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बुद्धांना गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न
*********************
No comments:
Post a Comment