*"बुध्द आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले" ...(continue)
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 7. सुरुवातीची लक्षणे (ii) 🌷
( Early Traits )
*********************
14) "शिकारीसाठी यायचे नसेल, तर निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणेबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये," त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिध्दार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, "मला निरुपद्रवी प्राण्याला मारताना पाहणे आवडत नाही."
15) सिद्वार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे.
16) त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, "तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे प्रशिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे."
17) सिध्दार्थ नेहमी गौतमीला विचारीत असे, "पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते?" आणि गौतमी उत्तर देई, "ते त्यांचे कर्तव्य आहे म्हणून."
18) तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, "मला असे सांग की, माणसाला मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते?"
गौतमी उत्तर देई, "ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे. पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील?"
19) "पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करु लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करु शकणार नाहीत का?" यावर गौतमी निरुत्तर होई.
20) तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून ध्यानाचा सराव करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. "मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत," अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरीता निवड करण्याविषयी तो त्यांना सल्ला देत असे.
21) परंतू त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत.
22) ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करु शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत.
23) त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास व कल आवडत नसे. ते क्षत्रियाच्या जीवनाच्या विरुद्ध आहे असे त्यांना वाटे.
24) योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृध्दिंगत होते, यावर सिध्दार्थाचा विश्वास होता. यासंबंधीची खात्री देताना तो म्हणे, "आपण जेव्हा प्राणिमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदभाव व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूंपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंचा द्वेष करतो."
25) ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादांपलीकडे जातो तेव्हाच हे करु शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. (...when we in our contemplation rise above the limitations of practical life)
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: ७. सुरुवातीची लक्षणे (iii)
*********************
No comments:
Post a Comment