पोस्ट नं 119

📚 पोस्ट नं 119 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
🌷3. शाक्यांनी केलेले स्वागत 🌷
Reception by the Sakyas
*************************
1) भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवांत दोन तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता.

2) मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्या वेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली.

3) त्या वेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणाम करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकेक मुलगा देण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परततांना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले.

4) ज्या कुटुंबांनी एकेक मुलगा संघाला देण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते.

5) अमितोदनाला दोन मुलगे होते. एकाचे नाव अनुरुद्ध. त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुस-याचे नाव होते महानाम.

6) महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, "तू तरी संसारत्याग कर किंवा मी करतो." आणि अनुरुद्धाने उत्तर दिले. "माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे. म्हणून तूच तसे कर."

7) "परंतु प्रिय अनुरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल. आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल, आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल."

8) "हे काम कधीच संपत नाही, आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल? श्रमाचा शेवट केव्हा होईल? आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुकता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनुरुद्धा, काम हे कधीच संपत नाही; आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो."

9) "मग कौटुंबिक कर्तव्ये करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो," अनुरुद्ध म्हणाला.

10) आणि शाक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, "आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे."

*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. शाक्यांनी केलेले स्वागत (ii)
*********************

No comments:

Post a Comment