

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home


Meeting Yashodhara and Rahula
*************************
1) शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळीनी त्यांचे आदराने स्वागत केले.
2) पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठविले; परंतु ती म्हणाली, "खरोखर, जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील."
3) आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, 'यशोधरा कुठे आहे?' आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले.
4) आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, "मी मुक्त आहे; परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये."
5) यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे आपुलकीने प्रेमनिर्भर झाली व तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही.
6) ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली.
7) परंतु तेथे शुद्धोदन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली.
8) यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोदन म्हणाला, "हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनाविवशता नाही. पतिविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेंव्हा तिनेही केशवपन केले. जेंव्हा तिने ऐकले की, आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते."
9) "हे केवळ तात्पुरत्या भावनाविवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय."
10) भगवंतांनी परिव्रज्जा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर, यशोधरेचे पावित्र्य, सौजन्य व सभ्यतापूर्ण सौम्यता आणि तिचे एकनिष्ठ प्रेम हे तिचे गुण त्यांना अनमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे 'कर्म' होते आणि तिच्या थोर पुण्याचाच (great merits) तो परिणाम होता.
*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. यशोधरा व राहुल यांची भेट (ii)
*********************
No comments:
Post a Comment