पोस्ट नं 115

📚 पोस्ट नं 115 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
🌷1. शुद्धोदनाची शेवटची भेट 🌷
Suddhodana and the Last Look
*************************

1) सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले.

2) भगवंत राजगृहात राहात असल्याचे ऐकल्यावर शुद्धोदनाने निरोप पाठविला की, "मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला; परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही."

3) निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदायिन् असे असून तो शुद्धोदनाच्या दरबारातील एका मनुष्याचा मुलगा होता.

4) तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, "जगद्वंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहात आहेत."

5) तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्यासोबत बऱ्याच मोठ्या संख्येने असलेल्या शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले.

6) भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते. परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोदनाला सांगण्यासाठी कालुदायिन् पुढे निघून गेला.

7) लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. "संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे." ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते.

8) आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोदन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला, तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य, सन्माननीय उच्चपद आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात.

9) हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रुप! तो महान श्रमण त्यांच्या ह्रदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती जास्त होते! तो मुनीश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अर्हत, सत्यविद् आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता.

10) आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोदन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, "आम्ही तुला पाहिल्याला आता सात वर्षे लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहात होतो!"

11) नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती. पण तसे धैर्य त्याला होईना. "सिद्धार्था," तो मनातल्या मनात उदगारला. "सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो!" परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाली.

12) याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरीपण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला.

13) "मी तुला माझे राज्य देईन," राजा म्हणाला, "पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील."

*************************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
१. शुद्धोदनाची अखेरची भेट (ii)
*********************

No comments:

Post a Comment