

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of Ratthapala
*************************
49) "आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही." राजा म्हणाला, "मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो." असे म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्ठपालाला भेटण्यासाठी निघाला.
50) रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यत गेल्यावर राजा आपल्या परिवाराबरोबर पायी चालू लागला आणि रट्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली.
51) "नाही, महाराज. आपण तेथे बसा. माझे हे आसन आहेच."
52) आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, "रट्ठपाल, माणसाला चार हानी भोगाव्या लागतात की, ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढीमिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या चार हानी म्हणजे
(1)म्हातारपण (2)अनारोग्य (3)दारिद्र्य आणि (4)नातलगांचा मृत्यू ह्या होत."
53) "समजा, एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर तारुण्यात आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपयौवनसंपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास?"
54) "किंवा समजा की, रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की, यातनाही भोगत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे; म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले? किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा?"
55) "किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. हे दारिद्र्यामुळे झालेले नुकसान असते. मात्र रट्ठपाल हा थुल्लकोट्ठित येथील सधन व मुख्य परिवारातील असून त्यांना कोणत्याही प्रकारचा संपत्तीचा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की, ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? आणि रट्ठपाला,नातेसंबंध संपल्यामुळे होणारा तोटा काय असतो? तर एखाद्याला भरपूर नातेवाईक, ओळखी, मित्रमंडळी असतात; व नंतर क्रमाने ते सर्व कमी होत संपून जातात. त्यावेळी त्याला वाटते की, "आता संपत्ती मिळविणे कठीण आहे, व उपयोगही नाही," इ. असा विचार करून तो केस कापून, काशाय वस्त्र लपेटून गृहहीन होतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की, ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास?"
56) रट्ठपाल उत्तरला, "महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की, ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक् सम्बुद्धांनी सांगितलेली चार तत्त्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती चार तत्त्वे अशी:–
(१) जग अनित्य असून सतत बदलत आहे.
(२) जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.
(३) आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.
(४) तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे.
57) "विलक्षण! खरोखरच उत्कृष्ट!" राजा उद्गारला. तथागतांनी सांगितले ते किती बरोबर आहे!"
*************************
खंड दुसरा: भाग तिसरा समाप्त
*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग चवथा- घरचे निमंत्रण
१. शुद्धोदनाची अखेरची भेट
*********************
No comments:
Post a Comment