

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of Sariputta and Moggalan
*************************
12) परिव्राजक सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, "ठीक आहे. आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा. परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला?"
13) अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले.
14) सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहात असत. त्यांनी एकमेकांना वचन दिले होते. 'ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुस-याला सांगावे' असे त्यांचे परस्परांत ठरले होते.
15) ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, "मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप स्वच्छ आणि तेजस्वी आहे; सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय?"
16) "होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे."
"मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले?"
नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला.
17) नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, "मित्रा, चल, आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरू होतील."
18) सारीपुत्त उत्तरला, "मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहात आहेत, आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू; मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील."
19) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, "मित्रहो, आम्ही तथागत बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
20) ते उत्तरले, "महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीही तोच मार्ग पत्करू."
21) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, "मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
22) संजय उत्तरला, "छे, छे; मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ."
23) सारीपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.
24) नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जेथे राहात होते त्या राजगृहातील वेळु-वनात गेले.
25) सारीपुत्त आणि मोग्गलान दुरुनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, "ते पाहा, भिक्खूहो, दोन सोबती येत आहेत." सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, "हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील."
26) वेळु-वनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग वंदन केले आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणांवर ठेवून ते तथागतांस म्हणाले, "तथागतांनी आम्हाला दीक्षा द्यावी."
27) नंतर, "एहि भिक्खवें" (Ehi Bhikku)
(भिक्खूंनो, या) हे शब्द तथागतांनी उच्चारले आणि सारीपुत्त, मोग्गलान आणि अडीचशे जटील बुद्धांचे शिष्य झाले.









*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा
(Conversion of Bimbisara)
*********************
No comments:
Post a Comment